मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘RRR’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १ हजार कोटींच्यावर कमाई केली आहे. तसंच चित्रपटाचे सक्सेस पाहता निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत फक्त संपूर्ण टीमने हजेरी लावली नाही तर त्यांच्यासोबत टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी एका मुलाखतीत बॅालिवूड अभिनेता सलमान खानने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न सलमानने केला होता. त्यावर आता राम चरणने उत्तर दिलं आहे.
राम चरणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथमध्ये ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा’ सारख्या चित्रपटांइतके बॉलिवूड चित्रपटांचे कौतुक का होत नाही? यावर उत्तर देत राम म्हणाला, “मला हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्दर्शकाने एक पॅन इंडिया चित्रपट दक्षिणेतही बनवून दाखवा अशी इच्छा व्यक्त केली आहे.”
“सलमानने ट्विट केले की, मला राम, राजामौली आणि तारक यांचे काम खरोखर आवडले, आमच्या चित्रपटांचे दक्षिणेत कौतुक का केले जात नाही. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. पण माझा विश्वास आहे की यात सलमानचा दोष नाही किंवा कोणत्याही चित्रपटाचा दोष नाही, तर लेखन हा आहे. आमचे चित्रपट तिकडेच पाहिले जातात किंवा आमचे चित्रपट इथेच पाहिले जातात…हे सगळं स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाची विचारसरणी आहे. प्रत्येक लेखकाने विजयेंद्र प्रसाद (आरआरआर) किंवा राजामौली यांच्यासारखा चित्रपट लिहावा आणि ‘त्यावर विश्वास ठेवा’ असं म्हटलं पाहिजे”. असं राम चरण म्हणाला.
पुढे बोलताना राम म्हणाला, “मला नक्कीच एक असा भारतीय चित्रपट बनवायचा आहे, जिथे मला बॉलिवूडमधील प्रतिभावान लोकांसोबत काम करायचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी दक्षिणेतील प्रतिभावान लोकांना शोधून मोठे चित्रपट बनवावेत. जेणेकरुन आपल्याकडे मोठे बजेट असतील आणि मग एक दिवस आपल्याला इथेही प्रेक्षकांची मोठी संख्या पाहायला मिळेल.”