मुंबई : (NCP Leader Jayant Patil On Press) सोमवार दि. २० रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल दोन तास सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं सुरु होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद त्यावेळी त्यांनी अशी भुमिका मांडली.
यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्याबाहेर असलेले शिवसेना आमदार परत येतील आणि पुन्हा आपल्या पक्षात कार्यरत होतील, हा विश्वास आम्हाला आहे. ते परत आल्यावर चित्र स्पष्ट होईल.
आम्ही आमच्या सर्व आमदारांना आम्ही त्यांना एवढचं सांगितलं की, या सगळ्यावर आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणे हाच एकमेव पर्याय आहे. यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना तुम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, विरोधी पक्षात बसायची तयारी करावी लागत नाही. परिस्थिती ती वेळ आणते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.