“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर संजय राऊतांची सडकून टीका

मुंबई | Sanjay Raut On Chandrakant Patil – सध्या भाजप नेते, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी आंबेडकर, फुले, कर्मवीर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून आता नवीन वादाल तोंड फुटलं आहे. पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. यामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केलाय.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात, ज्या पक्षाचे प्रवक्ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षाचा हा वंश आहे. हे सगळे अकलेचे कांदे आहेत. मग तुमच्या तिजोरीत येणारे पैसे पक्षाची भीक आहे असंच म्हटलं पाहिजे. तुम्ही जे खोके वाटले, तीही भीकच होती असं म्हटलं पाहिजे”, अशी टीका राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

“ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी टाटांपेक्षा जास्त उत्पन्न ज्योतिराव फुलेंचं होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती दानधर्मात, शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न 20 हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न 21 हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

काल (9 डिसेंबर) चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार त्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या आहेत. सरकारनं या शाळा सुरू करताना त्यांना अनुदान दिलेलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरवून दाखवलं.

Sumitra nalawade: