खारघर दुर्घटनेतील मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघड; डाॅक्टर म्हणाले, “काहींना आधीपासूनच…”

मुंबई | Kharghar Death Case – खारघर दुर्घटनेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर नुकताच या 14 जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात 14 मृतांपैकी 12 जणांनी गेल्या सहा ते सात दिवसांपासून काहीच खाल्ल नसल्याचं, स्पष्ट झालं आहे. तसंच बाकीच्या दोघांनी काही खाल्लं होतं की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शवविच्छेदन करणाऱ्या एका डाॅक्टरांनी सांगितलं की, मृत्यू झालेल्यांमध्ये काही जणांना आधीपासूनच व्याधी होत्या. अशातच वेळेवर न खाणे, प्रचंड ऊन याची भर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. उन्हाता बसलेल्या लोकांना पाणी पिल्यानंही काही फरक पडला नसता. कारण त्यांना सावलीची गरज होती.
तसंच पुरस्कार सोहळ्याच्या आदल्या दिवशी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करताना त्या अधिकाऱ्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता. पण ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी वरिष्ठांना सांगितली नव्हती, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
दरम्यान, रविवारी (16 एप्रिल) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम खारघरमध्ये भर दुपारी आयोजित करण्यात आला होता. दुपारी रखरखत्या उन्हात हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.