उदयनराजेंचा भाजप नेतृत्त्वाला खडा सवाल! म्हणाले; “नुपूर शर्मांप्रमाणे राज्यपालांवर…”

पुणे : (Udayanraje Bhosale On Narendra Modi) मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांवर वादग्रस्त विधाने करायची जणू का स्पर्धाच लावली आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. त्याच्या निषेर्धात आज शिवप्रेमी संघटनांनी पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी अल्का चौक डेक्कन ते लाल महाल चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सामील झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजचा मोर्चा पाहून सर्वांनी समजून घ्यायला हवं की, साडेतीनशे वर्षानंतरही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मोठा आदर पाहायला मिळतो. मी रायगडला गेलो तेव्हा वेदना झाल्या. ज्या रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला, त्याच रायगडावर शिवसन्मानाचा निर्धार करायला जावं लागलं, याची खंत वाटते.
उदयनराजे पुढं म्हणाले की, काही फुटकळ लोक महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व्हायला हवा, हे सांगण्याची गरज पडते यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. याआधी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर अशी कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबत ही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत नुपूर शर्माप्रमाणेच कारवाई व्हायला हवी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. त्यामुळे येत्या काळात भाजप त्यांच्या वाचाळवीर नेत्यांवर काही लगाम लावतंय का हे पाहवं लागणार आहे.