बंडखोर पस्तावणार?; अखेर उद्धव ठाकरेंनी हाती घेतलं हंटर!

मुंबई | CM Uddhav Thackeray On MLA’S – सध्या एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात चांगलाच गोंधळ सुरू आहे. तसंच राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यादरम्यान जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम सहा-अ मध्ये सहा-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदेंचं यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. तर गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसंच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन) खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसंच उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे.