शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; म्हणाले…
![शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; म्हणाले... Ashish Shelar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/Ashish-Shelar--780x470.jpg)
मुंबई : (Ashish Shelar On Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यात आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राची थेट शिवाजी महाराजांच्या अफजल खान भेटीशी तुलना केली.
आशिष शेलार म्हणाले, “ राहुल गांधीचं विधान हे खरा इतिहास लपवणारं आहे. जर अर्ध वाचलेलं पत्र राहुल गांधी देशासमोर दाखवणार असतील, तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना हेही इंदिरा गांधी यांचं पत्र वाचावं लागेल. हे पत्र स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं पत्र आहे. इंदिरा गांधी असं लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर आहेत.
त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात. ज्या वीर या शब्दावर स्वत: राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांच्या आजीचं पत्रही वाचलेलं नाही. पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचं युद्ध अतिशय धाडसी होतं. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील युद्धात त्याची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केलं आहे.”