अग्रलेखदेश - विदेशसंपादकीय

रुपेरी अपमृत्यूचा वाढता आकडा आणि हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका हे अनेक कलाकारांच्या मृत्यूचं प्रमुख कारण ठरलं. या क्षेत्रातले ताणतणाव, अपुरी झोप, शरीरावर सतत करावे लागणारे प्रयोग, मेक अप, अतितीव्र स्वरुपाचा व्यायाम अशा अनेक कारणांमुळे हृदयविकार या क्षेत्रातल्या अनेकांना गाठत असल्याचं दिसून येत आहे. मात्र कमी वयात होणारे हे मृत्यू खूपच धक्कादायक आहेत.

लोकप्रिय गायक केकेच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या मनोरंजनविश्वाला धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. केकेच्या आधी अनेक कलाकारांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिशी-चाळिशीत मृत्यू झाला. अशा अकाली मृत्यूंमुळे मनोरंजनक्षेत्राचं मोठं नुकसान झालं. मधल्या काळात संगीतक्षेत्रातले अनेक सितारे हे जग सोडून गेले. यामुळे संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

एकापेक्षा एक बहारदार गाणी देणार्‍या केकेच्या निधनाची बातमी चाहत्यांना धक्का देऊन गेली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना केके हे जग सोडून गेला. कोलकाता इथल्या कार्यक्रमात उत्साहाने गाणारा, हसर्‍या चेहर्‍याचा केके असा अचानक गेल्यामुळे संगीतविश्वाचं मोठं नुकसान झालं, ही बाब कोणीही नाकारू शकणार नाही. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी केके हे जग सोडून गेला. हृदयविकाराचा झटका हे केकेच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याने हृदयविकाराच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यातच कोलकाता इथल्या बंदिस्त सभागृहात एसी बंद असताना त्याने जीव तोडून गाणी म्हटली. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. केकेला हॉटेलवर नेण्यात आलं. तो तिथेच कोसळला. रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच केकेने प्राण सोडला. या धक्क्यातून त्याचे चाहते अद्यापही सावरलेले नाहीत.

केकेने एकापेक्षा एक सदाबहार गाणी दिली. ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या ‘तडप तडप के दिल से आह निकलती रही’ या गाण्यामुळे केकेला तुफान लोकप्रियता लाभली. केके हे नाव एका रात्रीत घराघरात पोहोचलं. तरुणवर्ग केकेच्या गायकीवर फिदा झाला. या गाण्यातून प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या हृदयातला दर्द, त्याच्या भावना केकेने अगदी योग्य पद्धतीने पोहोचवल्या. हे गाणं ऐकल्यावर आजही डोळ्यात पाणी उभं राहतं.

प्रेमभंग झालेल्या तरुणाची मानसिक अवस्था काय असेल, याची जाणीव होऊ शकते. यासोबतच सच कह रहा है दिवाना, आशाएं, हम रहें या ना रहें कल, याद आऐंगे ये पल अशी कायम स्मरणात राहणारी सुरेल गाणी केकेच्या स्वरांनी सजली आहेत. केके हे अत्यंत उत्साही आणि जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं. चित्रपटासाठी गाणं असो किंवा मैफलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं असो; तो अगदी समरसून गात असे. गाणं हा केकेचा श्वास होता. चित्रपटांसाठी पार्श्वगायन सुरू करण्याआधी त्याने जाहिरातींची जिंगल्स, तसंच मालिकांची शीर्षकगीतंही सादर केली, अनेकविध भाषांमधली गाणी आपल्या स्वरांनी सजवली. त्याच्याकडून अजून बरंच काही अपेक्षित होतं. अनेक सुरेल गाणी त्याच्या आवाजाने सजणार होती. मात्र त्याआधीच तो काळाच्या पडद्याआड गेला. केकेचा असा अकाली मृत्यू चटका लावणारा ठरला.

यंदा संगीतक्षेत्राला सातत्याने धक्के बसत आहेत. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, पंडित शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांच्या निधनाने संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालं. या सगळ्या धक्क्यांमधून सावरत असतानाच अनेक युवा कलाकार हे जग सोडून जात आहेत. संगीतक्षेत्राला पोरकं करत आहेत. संगीतक्षेत्राचं भविष्य असं अर्ध्यावर डाव मोडून जात आहे. ही बाब खरं तर खूपच दु:खद आहे. केकेच्या मृत्यूआधी सिद्धू मुसेवाला या युवा पंजाबी गायकाची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवालाचे चाहते जगभर पसरले आहेत. सिद्धूच्या हत्येचा सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेकांची नावं समोर येत आहेत. सिद्धू मुसेवालाचं आयुष्य अनेक वादांनी भरलेलं होतं. तो गाण्यांमधून बंदूक दाखवायचा. त्यामुळे तो बंदूक संस्कृतीला चालना देत असल्याचा आरोपही केला गेला. सिद्धूने नुकतीच पंजाब विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. पण त्याला पराभव स्वीकारावा लागला. सिद्धू मुसेवाला अवघ्या २९ वर्षांचा होता.

सिद्धू भारतासोबतच अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्येही बराच लोकप्रिय होता. त्याच्या जाण्याने पंजाबी संगीताचं खर्‍या अर्थाने नुकसान झालं आहे. एक युवा, उमदा गायक खूप लवकर काळाच्या पडद्याआड गेला. सिद्धू मुसेवालाने भविष्यात खूप चांगली गाणी दिली असती. पंजाबी गाण्यांना मुळातच असणारी लोकप्रियता सिद्धू मुसेवालासारख्या गायकांमुळे गगनाला भिडली होती. सिद्धूने येत्या काळात गायनक्षेत्रात मोठं योगदान दिलं असतं. पण हे फूल फुलण्याआधीच कोमेजून गेलं. तरसेम सिंग सैनी ऊर्फ ताज या गायकानेही खूप लवकर एक्झिट घेतली. तो आशियाई आणि पाश्चिमात्य संगीताचं मिश्रण करत असे. त्याने ही कला उत्तम प्रकारे साधली होती. प्यार हो गया, नाचेंगे सारी रात, गल्ला गुरियां ही त्याची गाणी चांगलीच गाजली. वयाच्या ५५ व्या वर्षी त्याने हे जग सोडलं. त्याच्या जाण्याने आशियाई आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा एक दुवा निखळला.

संगीतक्षेत्रातल्या या हिर्‍यांचं जाणं दु:खदायी होतंच, शिवाय अभिनयक्षेत्रातल्या कलाकारांचं अचानक जाणं मनाला चटका लावणारं ठरलं. अनेकांनी अगदी कमी वयात या जगाचा निरोप घेतला. २०२० मध्ये सगळं जग कोरोनाशी लढत असताना अचानक सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी आली. सुशांतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मध्यंतरी सुशांतला चांगलं यश मिळालं होतं. त्याचे चित्रपटही गाजत होते. मात्र चित्रपटसृष्टीतला भेदभाव, डावललं जाणं अशा काही कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोललं गेलं. आजही चाहत्यांना सुशांतची आठवण येते. सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्नही पडतो. सुशांतच्या जाण्याने बॉलिवूड एका चांगल्या, गुणवान कलाकाराला मुकलं, हेही तितकंच खरं.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली मृत्यूमुळेही चाहत्यांना मोठा धक्का बसला. सिद्धार्थ अवघ्या ४० वर्षांचा होता. तंदुरुस्त सिद्धार्थ अचानक हे जग सोडून गेला. सिद्धार्थ ‘बिग बॉस’चा एक भाग होता. त्याचं करिअर फुलत होतं. पण काळाला हे मंजूर नव्हतं. हृदयविकाराच्या झटक्याने या तरुण कलाकाराचं निधन झालं होतं. दाक्षिणात्य स्टार पुनीत राजकुमारच्या निधनानेही अलिकडे अवघा देश हादरला. त्याचे चाहते जगभरात पसरले आहेत.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पुनीतला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं. तो तंदुरुस्तीबाबत जागरूक होता. तो जिममध्येही जात असे. मृत्यूआधी त्याने काही व्हिडीओही पोस्ट केले होते. त्यातही तो चांगला दिसत होता. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाला आणि सगळं काही संपलं. त्याच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालं. गेल्या काही वषार्र्ंत बॉलिवूडला काही धक्के बसले. ध्यानीमनी नसताना अनेक कलाकार हे जग सोडून गेले आहेत. अभिनेता इरफान खानला कर्करोगाचं निदान झालं. त्याने उपचारही घेतले. पण काळाच्या मनात काही तरी वेगळंच होतं. कर्करोगाने इरफान खानसारखा आपल्यातून हिरावून नेला. हे कलाकार सोडून जातात आणि त्यांच्या आठवणी मागे राहतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये