सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ; आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी पाचशेच्याच स्टॅम्पचा होणार वापर

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने एका पाठोपाठ एक असे अनेक निर्णय घेतले. त्यात राज्यांच्या हिताच्या दृष्टीने एकूण १२०० हून अधिक शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्याअगोदर, लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र याचा मोठा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे आता हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
आजपासून १०० रुपयांचा स्टॅम्प इतिहासजमा
आजपासून शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे.
सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरती केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला दिले किती खिशातून जाणार किती असाच प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा सुद्धा भडका
दुसरीकडे, जीवनावस्यक वस्तू, औषधांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातील फोडणीला महागाईच्या झळा बसू लागल्याने लाडकी बहीण चांगलीच संकटात सापडली आहे. डाळ, तांदूळ, शेंगदाणे, कडधान्यासह मसाल्याच्या दर वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घराचे बजेट फोलमडले आहे. शासनाने एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून महिलांना महिना पंधराशे देत दिलासा दिला. मात्र दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला गेले आहेत. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घर चालवण्यासाठी असलेले बजेट बाढल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसेदेखील अपुरे पडू लागले आहेत.
गणेशोत्सवामध्ये १०० ते ११० रुपये किलोने मिळणारी तेलाची पिशवी १३० ते १४० रुपयांवर गेली आहे. १७०० रुपयांचा तेलाचा डबा २ हजारांवर पोहचला आहे. सध्या औषधांच्या किंमतीमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. व्याधीग्रस्तांनाही महागाईवा फटका बसू सागला आहे. गेल्या दीड महिन्यांतच खोबऱ्याचे दर दुपटीने वाढले आहेत. गेल्या महिन्यात १६० ते १६५ रुपयांवर असलेले खोबरे २५० रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपर्यंत खोबऱ्याचे प्रति किलो दर तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.