पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का..! हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली ‘तुतारी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,’जनतेच्या मनात एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. मी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनीही मला सांगितले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. असेही पाटील यांनी सांगितले. तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार हे आता निश्चित झालं आहे.
पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.