“जर अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही…”, उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई | Uddhav Thackeray – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (12 मे) पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जर अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न केला. यावर न्यायालयानं परखड भाष्य केलंय. ज्या सेनेवर बाळासाहेबांनी प्रेम केलं ती सेना भाजपच्या दावणीला बांधण्याचा डाव न्यायालयानं उघडा पाडला आहे. लवकरात लवकर अध्यक्षांनी परदेशी दौरा झाल्यावर निर्णय घ्यावा. पण जर अध्यक्षांनी काही वेडवाकडं केलं तर आम्ही ज्याप्रकारे निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो तसंच अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातही न्यायालयात जाणार.
महाराष्ट्राची बदनामी झाली असून ती होणं थांबली पाहिजे. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तुमची बदनामी जगभरात होईल. त्यामुळे लोकशाही जिवंत राहण्यासाठी 33 देशात आपले धिंडवडे निघू नये म्हणून अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा. आधी विधानसभा अध्यक्ष आमच्याकडे होते. मग ते राष्ट्रवादीत गेले आणि आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. त्यांना प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे चांगलंच कळतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.