इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले, “कोणीही…”

रायगड | Ajit Pawar – इर्शाळगडाच्या (Irshalgad) येथे असलेल्या एका वसाहतीवर दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये शंभरहून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी मध्यरात्री दरड कोसळ्याचे बोलले जात आहे. या दुर्घेटनेत जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे.
इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेनंतर अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचा वाढिदवस 22 जुलै रोजी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच होर्डिंग्स, जाहिरात, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.
तर या दुर्घटनेबाबत अजित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!