राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिअंट आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई | Corona Updates 2022 – सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रपती भवन येथे जनता दरबार उपक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॅान या व्हायरसचे व्हेरिअंट आढळून येत आहेत, त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही”,असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहे. मुंबईचा पॅाझिटीव्हीटी दर हा आजच्या दिवसाला ४० टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
पुढे राजेश टोपे म्हणाले की, “या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून हर घर दस्तक या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत.”