क्रीडामहाराष्ट्र

सत्तर मल्लांना नऊ लाखांचे बक्षीस

सातारा जिल्हा तालीम संघाचा स्तुत्य उपक्रम

सातारा : सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले बक्षीसपात्र सत्तर मल्ल, तसेच महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी विजेत्या सर्वांना तब्बल नऊ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा तालीम संघाचे प्रमुख मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक मिळकतीमधून तब्बल नऊ लाख रुपयांचे बक्षीस या मल्लांना देण्याचे जाहीर केले. पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुधीर पवार, तसेच तालीम संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. साहेबराव पवार पुढे म्हणाले, जिल्हा तालीम संघाने सर्व संचालक तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या सहकार्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले. सर्व संचालकांनी रात्रीचा दिवस करून सर्व संयोजन उत्तमरीत्या पार पाडले. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने ठरवून दिलेल्या संकेतानुसार आणि नियमास आधीन राहून या स्पर्धांचे संयोजन तब्बल ६३ वर्षांनंतर पुन्हा एकदा करताना जिल्हा तालीम संघ आणि त्यांच्या सदस्यांनी नेटकेपणाने या स्पर्धा पार पाडत सातार्‍याचा नावलौकिक राखला. मात्र संयोजनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र केसरी विजेता मल्लाने प्रसारमाध्यमांसमोर बक्षीस रक्कम न मिळाल्याची खंत व्यक्त केली. त्याची सल कुठेतरी मनामध्ये होती. त्यामुळेच माझ्या वैयक्तिक मिळकतीमधून तब्बल नऊ लाख रुपयांची बक्षिसे देण्याचा निर्णय मी घेतला आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत हा निर्णय पत्रकारांसमोर मी जाहीर करत आहे.

यामध्ये महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल पृथ्वीराज पाटील याला एक लाख वीस हजार रुपये, तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल याला ७० हजार रुपये, याशिवाय माती आणि गादी गटातील विजेत्या प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकानुसार सुमारे ७० मल्लांनी बक्षीसपात्र कामगिरी नोंदवली. सुवर्णपदक विजेत्या मल्लाला २००००, रौप्यपदक विजेत्या मल्लाला १०००० आणि कांस्यपदक विजेत्या मल्लाला पाच हजार अशी बक्षिसे जिल्हा तालीम संघाच्या वतीने देण्यात येणार आहेत. या रकमांचे धनादेश तयार करण्यात आले असून, त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधून हे धनादेश त्यांच्याकडे रवाना करण्यात येणार आहेत. त्यांच्यामार्फत ही रक्कम त्या खेळाडूंना पोहोच केली जाणार असल्याचे दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या बक्षिसाची रक्कम यापूर्वी कोणत्याही संयोजकांनी दिली नव्हती.

महाराष्ट्राच्या तसेच सातारच्या क्रीडा परंपरेला गालबोट लागण्याच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. उगाच कष्टाने केलेल्या सर्व कामांना कोणतेही बालंट नको, तसेच जे कष्ट प्रामाणिकपणे झाले त्या कष्टांचीही किंमत झाली पाहिजे. मल्लांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी नोंदवली. त्यामुळेच त्यांचे कौतुक क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच नऊ लाख रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात येणार असल्याचे दीपक पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दरम्यान झालेल्या खर्चाचे ऑडिट व्हावे अशी चर्चा सातत्याने होत होती. या अनुषंगाने दीपक पवार यांना छेडले असता ते म्हणाले, जिल्हा तालीम संघाच्या संचालकांनी लोकवर्गणी काढून हा सर्व खर्च केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये