नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप! म्हणाले; “देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी…”

मुंबई : (Nana Patole On BJP) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “सध्या भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात आहे. १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून, देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच ही परिस्थिती उद्धवली आहे.”
पुढे पटोले म्हणाले की, “तरुण पिढी नशेच्या आहारी जाणे आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही. अंमली पदार्थांची तस्करी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुजरातच्या मुंद्रा या खासगी बंदरात हजारो टन ड्रग्ज आल्याचे देशाने पाहिले, अशा घटना एकदाच घडलेल्या नसून अनेकवेळा घडलेल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही अंमली पदार्थाचा साठा असलेला कंटनेर जप्त करण्यात आला होता. अंमली पदार्थांची तस्करी राजरोस होत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचेच या घटनांवरून दिसते.”
मुंबई म्हणजे नशेखोर लोकांचे शहर झाल्याचे चित्र निर्माण करण्याचे काम मविआ सरकार असताना भाजप व त्यांच्या समर्थकांनी केले होते. हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे दोन-चार ग्रॅम गांजावर मात्र मोठा आकांडतांडव करत होते. देशात नशा करणाऱ्यांची वाढती संख्या व त्यावर नियंत्रण मिळवण्यात येत असलेले अपयश ही चिंतेची बाब आहे,” असं नाना पटोले म्हणाले.