“संजय राऊतांनी चोंबडेगिरी करू नये, ते आमच्या…”, नाना पटोलेंचा हल्लाबोल

नागपूर | Nana Patole On Sharad Pawar – काल (2 मे) शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत पण निर्णय राहुल गांधीच घेतात असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आज (3 मे) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप सोबत जाण्याची चूक करेल असं वाटत नाही. शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाहीत असा आमचा विश्वास आहे. तसंच संजय राऊतांनी चोंबडेगिरी थांबवावी. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं.”
“भाजप सोबत जाण्याची चूक राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाही. पण जर राष्ट्रवादी भाजप सोबत गेलीच तर आम्ही भाजपविरोधात लढू. त्यासाठी आमच्या सोबत जे येतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. तसंच शरद पवार हे महाविकास आघाडी स्थापन करताना सोनिया गांधीकडे गेले होते. सोनिया गांधी त्यांच्याकडे आल्या नव्हत्या”, असंही नाना पटोले म्हणाले.