“संजय राऊतांचा मला अभिमान…”,ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई | Uddhav Thackeray’s Reaction On Arrest Of Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (1 ऑगस्ट) संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. राऊतांना अटक झालेली असताना आता उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी तसंच भाजपवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते शरण जाऊ शकले असते पण गेले नाहीत. सध्याचं राजकारण घृणास्पद झालेलं आहे. निर्घृणपणे वागू नका. काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते माझे जुने मित्र आहेत. आत्ताच मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलो. त्यांनी काय गुन्हा केला आहे. ते पत्रकार आहेत. निर्भीड आहेत. जे पटत नाही, त्यावर ते बोलतात. मरण आलं तरी पर्वा नाही पण मी शरण जाणार नाही, असं राऊत म्हणतात. त्यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे शरण गेले आहेत ते हमाममध्ये अंघोळीला गेले आहेत. जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्याभोवती आहे, तोपर्यंत ते आमच्यावर टीका करू शकतात. जेव्हा सत्तेचा फेस निघून जाईन तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव होईल.”
“विरोधात कोणी बोलला तर त्याला अडकवायचं असं सुरु आहे. बऱ्या बोलाने शरण आले तर ठीक, नाहीतर कारवाई केली जात आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्याचीलच एका स्तंभाला आता अटक झाली आहे. राजकारणाची घृणा वाटायला लागली आहे. राजकारणात दिलदारपणा पाहिजे. इतर पक्ष संपवण्याची हौस असेल तर जनतेसमोर जायला हवे. तुमचे विचार मांडा. विरोधक त्यांचे विचार मांडतील. नंतर जनतेला निर्णय घेता येईल,” असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.