“हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये…”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Sanjay Raut – सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यापार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये सर्व विरोधक एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. ते आज (8 डिसेंबर) मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “’आप’ला दिल्ली महानगरपालिकेत मिळालेल्या यशासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. हिमाचल प्रदेश लहान राज्य असलं तरी तेथे काँग्रेस ज्या पद्धतीने लढते आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन करावं लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असंच लोकांना वाटतंय. देशाच्या पुढील निवडणुकीसाठी हे आशादायक चित्र आहे.”
“विरोधकांनी फक्त एकत्र येणं आणि मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपआपसातील मतभेद, हेवेदावे, अहंकार दूर ठेऊन एकत्र लढाई केली तर 2024 मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे हे निकाल आहेत. सगळे एकत्र येऊन लढले तर गुजरातमध्येदेखील लोकसभा निवडणुकीतही परिवर्तन होईल,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “या निवडणुकांशी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. त्यांच्या यात्रेशी या निवडणुकांचा संदर्भ जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राहुल गांधी काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत”, असंही राऊत म्हणाले.
One Comment