‘…कुणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे’; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
!['...कुणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे'; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा sanjay raut and raj thackeray](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/sanjay-raut-and-raj-thackeray.jpg)
मुंबई : नुकतंच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांनी घेतलेली मराठीविरोधी भूमिका आणि मुंबई तोडण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचं समर्थन करणार असाल तर माझ्यावर जरुर टीका करा. पण तुमची भूमिका बदलली असेल तर किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा, त्याच्यासमोर झुका आम्हाला काही म्हणायचं नाही. पण मराठी माणूस हे सहन करणार नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या आरोपांना तसंच टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी शिवराळ भाषेवरुन केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “होय…बरोबर आहे. पण ज्यासंदर्भात मी शिवराळ भाषा वापरली त्या शिवराळ भाषेचं कौतुक करायला हवं होतं कारण कालपर्यंत मराठी अभिमानी म्हणून ते मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जर माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठीप्रेम दिसलं असतं”.
“किरीट सोमय्यांविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे. माझी उद्धव ठाकरेंशी यावर चर्चा झाली. किरीट सोमय्यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती. याच किरीट सोमय्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी कोर्टात धाव घेतली होती त्यांच्याविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. हेच किरीट सोमय्या आणि त्यांचे अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी सादरीकरण तयार केलं आहे. मुंबई महााराष्ट्रापासून तोडावी, मराठी माणसाचा अधिकार असू नये यासाठी सादरीकरण तयार असून दिल्लीत जाऊन सतत लॉबिंग करत आहेत. किरीट सोमय्या आणि काही बिल्डर्स सूत्रधार आहेत असं समजल्यानंतर तोंडातून शिवी बाहेर पडली असेल तर मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि उत्तेजन देईल. हा शिवसेनेच्या तोंडातून निघालेला अंगार आहे,” असं देखील संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, “किरीट सोमय्या ज्यांना शिवी घालतो असा आक्षेप आहे त्यांना अजून घालणार कारण ते महाराष्ट्रद्रोही आहेत. आयएनएस विक्रांतचा घोटाळा करणारे किरीट सोमय्या प्रिय असतील तर त्यांना बोलवा आणि तुमच्या वतीने एखादं पदक देऊन टाका. तुमचं रत्न म्हणून मिरवायचं असेल तर त्यांच्या गळ्यात ते पदक घाला. हे ढोंग आणि भंपकपणा सुरु आहे. हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एका द्वेषातून तुम्ही हे सर्व बोलत आहाता. हे तुम्ही बोलत नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे. तुम्ही फक्त फुंका मारत आहात. महाराष्ट्राच्या जनतेला यात रस नाही.”