सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहेत; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई | Uddhav Thackeray – सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरमध्ये ‘कर्नाटक भवन’ बांधणार असल्याचं विधान केलं होतं. बोम्मई यांनी केलेल्या या विधानावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? मुख्यमंत्री बेळगावच्या प्रश्नावर गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही?, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज (3 डिसेंबर) सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“साधारणता प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असतात. मात्र, आपलं आणि कर्नाटकचं नातं काय आहे हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेलं नाही. ते महाराष्ट्रात ‘कर्नाटक भवन’ बांधत असतील तर आजच मी वृत्तपत्रात वाचलं की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादाच्या मुद्यावर आक्रमक होत असतील तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आता कर्नाटकनं आपल्या तलावांमध्ये पाणी सोडलं आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहेत. या नेभळटपणाविरुद्ध आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.