2024 च्या लोकसभेत भाजप-शिंदे गटाला ‘दुहेरी आकडा’ नाही! विनोद तावडे समितीचा केंद्राला अहवाल?

मुंबई : (Vinod Tawade On Narendra Modi) 2024 च्या लोकसभा निवडणुकीला घेऊन देशात एकंदरीत काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती तयार केली होती. या समितीने प्रत्येक राज्यातील स्थानिक पदाधिकारी, अभ्यासक व विश्लेषक यांच्याकडून माहिती घेऊन राज्यनिहाय आपला अहवाल तयार केला. लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीने आपल्या अहवालात महाराष्ट्रात नकारात्मक स्थिती असल्याचे सांगितलं आहे. भाजप-शिंदे गटाला लोकसभेत दोन अंकी आकडा पार करण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागणार आहे, असा अहवाल केंद्रीला पाठवल्याचं समजलं आहे.
त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगात पावले उचलत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचे नॉट रिचेबल असणे, अमित शहांचा महाराष्ट्र्र दौरा, बावनकुळेंना दिल्लीला तडफडकी बोलावणी हे त्याच प्रक्रियेच्या घडामोडी असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटस टू मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना भाजप आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत आहे.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे महाराष्ट्रातील 48 पैकी 42 खासदार होते. मात्र आता ती संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. अजित पवार उघड उघड बोलत नसले तरी भाजप ऑपरेशन लोटस टू वर ठाम आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे एकमेव लक्ष लोकसभा निवडणुकीवर आहे. देशात महाराष्ट्रासह बिहार आणि कर्नाटक या राज्यात भाजपाला मोठे नुकसान होईल असेही तावडे समितीने अहवालात नमूद केले आहे.
मात्र या तीन राज्यांपैकी ऑपरेशन लोटससाठी पोषक वातावरण सध्या महाराष्ट्र आहे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत आहे .त्यामुळे राज्यातच्या राजकारणात पडद्यामागे कमालीच्या हालचाली सुरु आहेत. मी राष्टवादीत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत असेल, अजित पवार यांनी खुलासा केला असला तरी, मात्र महाराष्ट्रासंदर्भात विनोद तावडे समितीचा आलेला अहवाल आणि पडद्यापाठीमागे घडत असलेल्या घडामोडीने महाराष्ट्र राजकारणात ऑपरेशन लोटस टू ची चर्चा रंगली आहे.