ताज्या बातम्यारणधुमाळी

“बावन कुळे सोडा लाख कुळे आले तरी…”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

मुंबई | Jitendra Awhad On Chadrashekhar Bawankule – सध्या देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘मिशन बारामती’ला सुरूवात झाली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बावनकुळेंनी बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (7 सप्टेंबर) ट्विटरच्या माध्यमातून बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

“देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटना मजबूत होते, तेव्हा संघर्ष करण्याची ताकद येते. जेव्हा ती ताकद येते, तेव्हा अनेक चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कुणाचा गड, वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं. आम्ही ठरवलंय की आमची ताकद तेवढी वाढवायची आणि आमच्या भरवशावर शिवसेना-भाजपनं चांगली कामगिरी करायची आणि ही जागा निवडून आणायची”, असा निर्धार चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती दौऱ्यादरम्यान व्यक्त केला. यावेळी बावनकुळेंनी काटेवाडीतील मारुती मंदिरात दर्शन देखील घेतलं.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “1990 नंतर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही हे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उमगलं. त्यानंतर जे कधी सत्यात उतरले नाहीत असे खोटेनाटे आरोप सातत्याने, बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“आजही काहीजण परत एकदा शरद पवार आणि बारामती यांच्याबद्दल बोलत आहेत. गड उद्ध्वस्त करू म्हणून वल्गना करत आहेत. विसर्जन करू म्हणत आहेत. अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून”, असा टोला देखील आव्हाडांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लगावला आहे.

“बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारुतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म शरद पवार याच मारुतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?”, असं देखील आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्धारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये