महावितरणचा रात्रीस ‘महाखेळ’ चाले…!

पुणे: गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पुणे शहराच्या नागरीकरणात मोठी वाढ झाली आहे, त्यातूनच शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये बांधकामे वाढल्याने ग्राहकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांच्या मागण्या आणि कामांचा वाढता जोर याचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असून त्याचा जबरदस्त फटका ग्राहकांनाच सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कामाला ‘ गती’ देण्यासाठी काही कार्यालयात अधिकारी आणि कर्मचार्यांचा रात्रीस ‘ महाखेळ’ सुरु झाला आहे.
ग्राहकांना दर्जेदार आणि उत्तम सेवा मिळावी यासाठी राज्य शासन आणि महावितरण Electric power distribution company प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत, तरीही ग्राहकांची वाढती संख्या आणि कमी असणारा कर्मचारीवर्ग यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला नाकीनऊ आले आहे. वास्तविक २५ हजार ग्राहकसंख्य असलेल्या भागासाठी किमान एक विभाग असावा, असा महावितरण प्र्शासनाचा नियम आहे. मात्र; बहुतांशी ठिकाणी हा नियमच बासनात गुंडाळल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्याचा जोरदार फटका ग्राहकांना बसत असून या ग्राहकांना दर्जेदार सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
शहर आणि विशेषत: महावितरणसाठी सर्वाधिक महसूल देत असलेल्या वाघोली, खराडी, वडगावशेरी या भागामध्ये सध्या एक लाखांच्याही वरती ग्राहक आहेत. हे वास्तव असले तरी यातील तीनही भागासाठी प्रत्येकी एक विभाग कार्यालय आहे, याठिकाणी अतिरिक्त विभाग कार्यालये सुरु करावीत यासाठी स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला होता. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर केवळ खराडी आणि वडगावशेरी या विभागांना मान्यता देण्यात आली. मात्र; ही मंजूरी मिळून काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही ही कार्यालये अद्याप प्रत्यक्षात सुरु झालेले नाहीत, विशेष म्हणजे ग्राहकांचा सर्वाधिक ’ भार’ असलेल्या वाघोली विभागासाठी अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.