“राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्यातील जनता पेटून उठेल”

मुंबई : विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. परंतु, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
पाटील यावेळेस बोलताना म्हणाले की, ज्यांच्या पुढाकाराने राज्यात हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल. म्हणून भाजपनं राष्ट्रपती राजवट लावण्याचा दबाव आणल्यास राज्यातील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशााराही पाटील यांनी यावेळेस दिला आहे.
नवनीत राणा अन् रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर काल दिवसभर राज्यातील वातावरण चांगलंच तंग असल्याचं पहायला मिळालं. राजकीय घमासानामुळे आता राज्यात सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांच्या समोर येऊन ठेपले आहेत. भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येण्याची सातत्यानं मागणी केली जात असताना मविआकडूनही आता भाजपला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर देण्यात येत आहे.