‘तुम्ही मारायला गेला होतात कुणाला आणि…’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा

सांगली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून मोठा वाद सुरू झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील तापलं आहे. असं असतानाच आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राजकीय संघटनांकडून विरोध केला जात आहे. भाजपा नेते बृजभूषण सिंह यांनी तर राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला एकीकडे तीव्र विरोध होत असताना त्यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आज १० वाजल्यानंतर तुम्ही या रस्त्यावरून कुठेही गेलात, तर सगळीकडे शांतता असते. देवळातून टाळ-मृदुंगाचा आवाज येतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सकाळी गेलेला शेतकरी रात्री परत येतो तेव्हा देवळात जातो. डोकं शांत करत भजन-कीर्तन करतो. तुमच्या आरत्या-भजन कीर्तन बंद झालं. तुम्ही मारायला गेला होतात कुणाला आणि मारलंत कुणाला. असं करायचं नसतं”.
“स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात भांडणं लावून झाली. ते जमलं नाही. आता जाती-जातीत भांडणं लावतील”, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.