“आमदारांचं अपहरण होणं हे…”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप

मुंबई | Sanjay Raut On BJP – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार घेऊन गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे. हे सर्व कटकारस्थान एकटे शिंदे करू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत, तोपर्यंत कोणतंही मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण होणं शक्य नाही,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व प्रसंगातून शिवसेना तावून सुलाखून निघेल. सीतेला एकदाच अग्रिपरीक्षा द्यावी लागली होती. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरं गेली आहे. स्वत: ला शिवसैनिक म्हणवून घेणारे कितीजण निष्ठेच्या अग्निपरीक्षेत पास होतात, हे भविष्यात दिसेल,” असंही राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, “जी परिस्थिती मला दिसत आहे, त्यानुसार विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात आहे. मी माझं मत व्यक्त केलंय ते फारसं चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात सध्या आमदारांवर दबाव आणणे, पळवापळवी करणे, प्रलोभने देणे, महाराष्ट्राच्या बाहेर नेवून त्यांच्यावर हल्ले करणे, या घटनांमुळे महाराष्ट्रातलं सरकार अस्वस्थ आहे. प्रमुख नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे भविष्यात काय वळण येईल, हे सांगू शकत नाही.”