परवानगीचे ‘विघ्न हरले’

पुणे- Ganeshotsav 2022 : गणपती उत्सवाचे वेध लागले असताना गणेश मंडळाची लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यंदा दोन वर्षांनंतर येणार्या दोन धडाकेतील गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांसाठी परवानग्याचे संकट दूर होणार असल्याचे दिसते. दरवर्षी होणार्या किचकट प्रक्रियेतून त्यांना विघ्नहर्त्याने परवानगीचे विघ्न दूर केले आहे. पोलिस आयुक्तांनीही तसेच संकेत दिले आहेत. गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षी परवानगी घेण्यापेक्षा एकदाच पाच वर्षाची परवानगी द्या, अशी मागणी केली होती. त्याला पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गणेश उत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा आणि मंडळांचा आणि प्रशासनाचा वेळ वाचावा यासाठी दरवर्षीच्या घ्याव्या लागणार्या परवानगी आहेत, त्या पाच वर्षांसाठी एकदाच द्या, अशी मागणी गणेश मंडळाचे जय गणेश व्यासपीठ यांच्यामार्फत प्रशासनाला करण्यात आली आहे. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव हा जगभरामध्ये पोहोचला. तो गणेश मंडळांमुळे आणि त्याच गणेश मंडळांनी पाच वर्षाची परवानगी एकदाच आम्हाला द्या, जेणेकरून गणेशोत्सव आणखी जास्त जल्लोषात मंडळाला करता येईल, अशी मागणी केली आहे.
तीच जागा असेल, तेवढाच एरिया असेल, तोच मंडप असेल आणि त्या सगळ्या परवानगी लागणार असतील तर ती पाच वर्षांसाठी द्यावी. जेणेकरून यातून कार्यकर्त्यांचा आणि मंडळांचाही वेळ वाचेल आणि प्रशासनाला जनतेची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. त्यांच्यामुळे हा एक लोकाभिमुख निर्णय होण्यासाठी ही मागणी केली असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले. भाऊ रंगारी गणेश मंडळाचे परेश खांडगे यांनी या परवानगी घेण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा दिवस लागतात.
दरवर्षी कार्यकर्ते नवीन असतात त्या सगळ्या गोष्टी परत समजावून सांगणे आणि त्या परत करणे याच्यासाठी वेळ जातो. त्यामुळे आम्ही सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन या मागणीचा विचार प्रशासनाने करावा यासाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. प्रशासन त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी सर्व गणेश मंडळांना अपेक्षा आहे. यातून गणेश उत्सव अधिक जल्लोषात, उत्साहात आणि लोकाभिमुख करता येईल, असे म्हटले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी महापालिका, तसेच पोलिसांकडूनही मंडप उभारणीपासून मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आदींसाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सर्वच गणेश मंडळांनी घेतला असून, त्याकरिता जय गणेश व्यासपीठातर्फे शहराच्या उपनगरांमधील गणेश मंडळांची बैठक नुकतीच घेण्यात आली.