“ते परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहा”

सांगली | Diwakar Rawate On Shinde’s Group – मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंची साथ सोडून आमदार-खासदारांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत, त्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, काही दिग्गज नेते शिवसेना वाचवण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
शिवसेना नेते व माजी मंत्री दिवाकर रावते (Diwakar Rawate) यांनी मुख्यमंत्री शिंदे समर्थकांवर निशाणा साधला आहे. “जे बंडखोर गेले ते शिवसेनेचे कधीच नव्हते, भाजप (BJP) बंडखोरांना जवळ करून सेना संपवण्याचं काम करीत आहे, ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना आहे. ती कधीही संपणार नाही, जे गेलेत त्यांना आगामी निवडणुकीत संपवायचं आहे”, असं दिवाकर रावते म्हणाले. ते सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
गेलेली माणसं परत येत नाहीत त्यामुळं त्यांचा शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा किंवा ते परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहून आणि आपलं काम गतीनं सुरू करू. पूर्वी पेक्षा जास्त ताकदीनं पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आत्तापासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना (Shivsena) पाडायची हा डाव आहे. त्यांना पाहिजे ते घडवून आणण्याचं काम करीत आहेत. आता जास्तीत जास्त सभासद करा. या लढाईत आपल्याला शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. एकी करा, पक्ष बळकट करा, असं आवाहन रावतेंनी केलं आहे.