अरविंद केजरीवाल यांनी केली ‘ही’ नवीन मोठी घोषणा

नवी दिल्ली | Arvind Kejriwal Make India Number One Campaign – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक नवीन मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ‘मेक इंडिया नंबर वन’ या नव्या मिशनची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला भारताला जगात नंबर वन बनवायचे आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी हे अभियान सुरू केलं जात असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, ही स्वप्नपूर्तीची सुरूवात आहे. भारताने जगातील नंबर वन देश व्हावे अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशात भारताची गणना व्हायला हवी. भारत एक शक्तिशाली राष्ट्र बनला पाहिजे असं म्हणत भारत एक महान देश असून, आपली सभ्यता हजारो वर्षे जुनी असल्याचं केजरीवाल म्हणाले. एक काळ असा होता की, जगभर भारताचा डंका वाजत होता. हे लक्ष्य समोर ठेवून आपल्याला भारताला पुन्हा महान बनवायचं असून, भारताला नंबर वन बनवण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी 130 कोटी जनतेला याला जोडावे लागले.
पुढे ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, या काळात आपण खूप काही मिळवले, पण लोकांमध्ये संताप आहे. प्रश्न असा आहे की, या 75 वर्षांत असे अनेक देश आहेत जे आपल्यानंतर स्वतंत्र झाले आणि आपल्या पुढे गेले. सिंगापूरला आपल्यानंतर 15 वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं, आज त्यांनी भारताला मागे टाकत आघाडी घेतली आहे. भारतातील लोक जगातील सर्वात बुद्धिमान आणि मेहनती लोक आहेत, जगातील सर्वोत्तम आहेत तरीही आपण मागे राहिलो. जर देश काँग्रेस-भाजपच्या भरवशावर सोडला तर, पुढची 75 वर्षे आपण मागे पडू असा हल्लाबोल देखील केजवाल यांनी केला आहे.