पुणे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर केला गंभीर आरोप! “नव्याने समाविष्ट केलेल्या त्या 34 गावांना..”

पुणे : (Prashan Jagtap On State Government) आज पुणे राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांना वगळण्यात येणार आहे. असा शिंदे-फडणवीस यांचा मानस असल्याचे दिसून येत आहे. त्यांना समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमुळे आगामी महापालिकेत पराभव दिसून येत आहे. त्यामुळे ही गावे वगळण्यात येणार आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी 2017 च्या प्रभाग रजनेनुसारच निवडणूक घेण्यात याव्यात या भाजप पुणे पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. याउलट आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महापालिका निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार व्हाव्यात यासाठी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भाजपच्या या राजकीय खेळीला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आम्ही ही बाब आणणार आहोत. त्याचबरोबर रस्त्यावर देखील उतरून आम्ही लढाई करू. याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.