हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी शाहरुखने बदलले होते नाव; खुद्द गौरीने केला खुलासा

मुंबई | रोमान्सच्या बादशहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच रोमॅंटिक आहे हे त्याच्या आणि गौरी खानच्या (Gauri Khan) लव्हस्टोरीकडे बघून आपल्याला जाणवतं. बॉलिवूडमध्ये या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून बघितलं जातं. शाहरुख आणि गौरी हे जोडपं गेली 30 वर्ष एकत्र आहे. एका मुलाखतीदरम्यान गौरी खानने त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला. गौरीचे आई वडील आणि घरची इतर वडीलधारी मंडळी प्रथम या लग्नाच्या विरोधात होते. 2008 साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौरीने याबद्दल खुलासाही केला होता. या दोघांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख केवळ 26 वर्षांचा होता अन् गौरी ही फक्त 21 वर्षांची होती.
गौरी मुलाखतीमध्ये म्हणाली, “आम्ही त्यावेळी लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यासाठी लहान होतो, आणि चित्रपटक्षेत्रात जाणाऱ्या एका दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी मी लग्न करणार होते. त्यावेळी आम्ही शाहरुखचं नाव बदलून अभिनव ठेवलं होतं जेणेकरून तो हिंदू असल्याचं समाधान आम्हाला मिळेल, पण ते खूप मूर्खपणाचं आणि बालिश वागणं होतं याची मला जाणीव नंतर झाली.”
शाहरुख आणि गौरी यांची तीनही मुलं हे दोन्ही धर्मांचं पालन करतात हेदेखील तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, “दिवाळीच्या दिवशी घरातील पूजा मी करते आणि इतर सगळे त्याप्रमाणे मला फॉलो करतात, ईदच्या दिवशी शाहरुख सगळी प्रार्थना करतो आणि आम्ही सगळे त्याचं अनुकरण करतो. आमच्या मुलांनी ही गोष्ट अगदी सहज स्वीकारली आहे, उलट याबाबतीत त्यांचा ओढा शाहरुखकडे जास्त असतो, तो जे सांगेल तसं ते करतात. त्यांना दिवाळी ईद दोन्हीचं खूप कौतुक आहे.”