मनोज जरांगेंकडे ८०० इच्छुकांचे अर्ज; निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात हालचाली

मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय पटलावर स्वतःच्या ताकदीचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी राज्यभरातून त्यांच्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाली आहे.
“इच्छुक उमेदवारांशी मी संवाद साधेल. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तूर्त आमच्याकडे ८०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेत,” अशी माहिती जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यामुळे ते आपल्या निर्णयावर फेरविचार करत आहेत. ही इच्छुक राजकीय मंडळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये परतण्याच्या दिशेने विचार करत आहेत. विशेषतः या नेत्यांनी उमेदवारीच्या आशेने जरांगे यांच्या आंतरवाली सराटीतही गर्दी केली आहे.
शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर मराठवाड्यातील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्राध्यापक रमेश बोरनारे, तानाजी सावंत या ९ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले. त्यामुळे या आमदारांच्या मतदारसंघांत पक्षसंघटना मजबूत करण्यासह नवे उमेदवार उभे करण्यावर उद्धव ठाकरे यांना जोर द्यावा लागणार आहे.
त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पैठणमध्ये राष्ट्रवादीतून दत्ता गोर्डे, पैठण येथीली संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे, वैजापूरमध्ये प्रा. बोरनारे यांच्याविरोधात दिनेश परदेशी यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
यापूर्वी या मतदारसंघात भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गटात प्रवेश केला होता. पण परदेशी यांच्या प्रवेशामुळे त्यांनी पुन्हा ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. सिल्लोडमध्ये मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांना अद्याप नवा भिडू मिळवता आला नाही. दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर बीड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या मतदारसंघातून शरद पवारांना भेटून येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.