तीन आमदार, एक खासदार असूनही वरळीत मैदान शिवसेनेला का मिळाले नाही? वाचा सविस्तर

मुंबई : (Aaditya Thackeray On BJP Leader) मुंबई, ठाण्यासह राज्यभर आज दहीहंडीचा मोठा उत्साह आहे. ठाण्यात टेंभी नाका येथील दहीहंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली तर दुसरीकडे युवासेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मुंबईत वरळीसह भायखळा येथे आयोजित दहीहंडीमध्ये हजेरी लावली. सर्वत्र दहीहंडीचा खूप उत्साह आहे. दहीहंडीला मी अनेक ठिकाणी जाणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरेंना दहीहंडी आयोजित करण्यासाठी वरळीतील जांबोरी मैदानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, दहीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अर्ज केलाच नव्हता. आजचा अनंदाचा दिवस आहे. तो सर्वांनी उत्साहात साजरा करावा. यावेळी पोरकट राजकारणात मला जायचं नाही, असं म्हणत जांबोरी मैदानाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीतील जांबोरी मैदानाच्या विकासाबाबत आम्ही दोन वर्षापूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून जांबोरी मैदान चांगले केले. यामुळे प्रत्येक गोष्टी राजकारण आणू नये, अशी माझी सर्वांना विनंती आहे. हा बालिशपणा आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर केली. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार आहे. तरीही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळवता आले नाही. आदित्य ठाकरे हे वरळी, भायखळा, ताडदेव आणि गिरगाव येथे शिवसेनेकडून आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी होत यावेळी त्यांनी गिरगावात ‘निष्ठावंतांच्या दहीहंडी’ उत्सवास भेट दिली.