“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय ते…”, अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई | Abdul Sattar On Aditya Thackeray – गेल्या दोन दिवसांपासून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्राहाबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्यानं करत होतो. पण, पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यानं महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“खरंतर मला आश्चर्य वाटतंय आदित्य ठाकरेंचं. तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईनं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, असा खोचक टोलाही अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.