“…तर मी वाॅशरूमलाही जायचं नाही का?”, अजित पवारांचा नाराजीनाट्यावरून संतप्त सवाल

मुंबई | Ajit Pawar’s Angry Question About His Unhappiness In NCP National Conference – दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उठून गेलेले दिसले. त्यानंर ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी वाॅशरूमलाही जायचं नाही का?”,असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. तसंच माध्यमांनी वस्तुस्थितीवर आधारित बातम्या द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. ते सोमवारी (12 सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रविवारी (11 सप्टेंबर) दिल्लीत पार पडलं. एक विस्तारीत कार्यकारणी होती त्याची बैठक शनिवारी (10 सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली आणि रात्री नऊ ते 10 वाजेपर्यंत चालली. नंतर खुलं अधिवेशन होतं, ते रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होतं. त्या पद्धतीने ते झालं.”
“या अधिवेशनात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची पुढील धोरणं आणि पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांनी राज्याची भूमिका मांडली. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे मी तेथे बोलणं टाळलं. परंतु माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “वास्तविक राष्ट्रीय अधिवशनात बोलू नका असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही. तसं बघितलं तर सुनिल तटकरे वेळेअभावी बोलू शकले नाहीत. त्याचबरोबर वंदना चव्हाण यांचंही नाव होतं. त्याही वेळेअभावी बोलू शकल्या नाहीत. याशिवाय आणखी दोन तीन राज्यांचे प्रतिनिधी तेथे आले होते, तेही बोलू शकले नाहीत.”
“मी नंतर मराठी माध्यमांशी चर्चा केली. त्यांना साधारण काय झालं ते सांगितलं. मी मध्ये वाॅशरूमला बाहेर गेलो, तर अजित पवार बाहेर गेले म्हणून कारण नसताना चर्चा करण्यात आली. मी वाॅशरूमलाही बाहेर जायचं नाही का? मला काही कळत नाही. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थितीवर आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे,” असं देखील पवार म्हणाले