5G लाँच होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ही सेवा…”

मुंबई | CM Eknath Shinde On 5G – आज (1 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) लाँच केली आहे. त्यामुळे आता देशातील इंटरनेट सुस्साट होणार आहे. या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 5G च्या लाँचिंगमुळे एक नवीन क्रांती घडणार आहे. सुरूवातीला ही सेवा भारतातील मोजक्याच शहरात सुरू केली जाणार आहे. यात राज्यातील मुंबई, पुणे आणि पनवेल या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
5G सेवेमुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास देखील मदत होणार आहे. ऑनलाईन ज्या काही सिस्टिम आहेत त्या अपडेट आणि अपग्रेड होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. आपला देश विकासाकडे जात असून यात 5G चं योगदान फार महत्त्वाचं असणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, भारताच्या विकासात महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केला जात आहे. यासाठी शेती, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मुलं खूप हुशार असल्याचंही शिंदेंनी यावेळी सांगितलं.