सामाजिक संस्था-पोलिसांत संवाद हवा : भानुप्रताप बर्गे

पुणे : ‘सामाजिक संस्था म्हणजे बिनकामाच्या लोकांचे उद्योग, फॉरेन फंडिंगसाठी उभारलेली व्यवस्था असा प्रशासनाचा बऱ्याचदा समज असतो. मात्र, सामाजिक संस्था या समस्यांचे निराकरण करणारे केंद्र असल्याचे प्रत्यक्ष कामात सहभागी झाल्यास जाणवते. अनेकदा समस्या या संस्थांकडे आधी येतात आणि नंतर पोलिसांना समजतात. त्यामुळे संस्था आणि पोलिस यांच्यात संवाद होत राहिला, तर समस्या लवकर सुटण्यास मदत होईल,’ असे मत माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले. वंचित विकास संस्थेच्या वतीने (स्व.) विलास चाफेकर प्रथम स्मृतिदिनानिमित्त एकदिवसीय सामाजिक परिषदेचे आयोजन केले होते.
‘वंचित विकास’चे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, कार्यवाह मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत गबाले, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले उपस्थित होते. सामाजिक कार्य आणि कायदा यावर ॲड. शिवराज कदम जहागीरदार, ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्रामवर डॉ. नारायण देसाई, सजग नागरिक मंच विवेक वेलणकर, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया अरुणा विचारे, जीवित नदी शैलेजा देशपांडे, बालरंजन केंद्र मुलांच्या अधिकारी माधुरी सहस्रबुद्धे, सामाजिक संस्था आणि फंडिंग एजन्सी संवाद यावर मंजूषा दोषी, संस्कार संजीवनी फाउंडेशन परमेश्वर काळे, परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धनराज बिराजदार, इन्स्टिट्यूट ऑफ स्टडी ॲब्रॉड उत्तरा जाधव आणि शासन व सामाजिक संस्था यावर वैशाली नवले यांनी सामाजिक परिषदेत आपले विचार मांडले.