गोट्या, विटू-दांडू खेळणाऱ्यांनाही आरक्षण द्या, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांवर भडकले!

पुणे : (Competition Students On Eknath Shinde) आज राज्यभरात आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा केला आहे. दहीहंडीमध्ये भाग घेतलेल्या गोविंदा पथकांसाठी राज्य सरकारने अनेक निर्णयांची काल अधिवेशनात घोषणा केली. याच घोषणांमुळे अनेक वर्षांपासून नशिब अजमवू पहाणारे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मात्र संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, या घोषणेवर प्रतिक्रिया देताना आता गोट्या, विटीदांडू खेळणाऱ्यांना देखील आरक्षण द्या, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांसाठी विमा कवच, तसेच सरकारी नोकरीत आरक्षण अशा विविध प्रकारच्या घोषणा गोविंदा पथकांसाठी केल्या आहेत. तर गोविंदा पथकांना सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल ही मोठी घोषणा केली होती.
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्यासोबतच सरकारने हा जो पूर्ण खेळ लावला आहे, तो बंद करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिला.