शरद पवारांमुळेच राज्यात २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट : देवेंद्र फडणवीस

: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा केला आहे. एका मुलाखतीत फडणवीस यांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लागू झाली, याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
राष्ट्रवादीला भाजपसोबत सरकार स्थापन करायचे होते
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “२०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं; परंतु त्यांच्या महाआघाडीकडेही बहुमत नव्हतं. आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छितो, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेवून सांगिलते. त्यानंतर मी स्वत: आणि अमित शहा, शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याच बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.”
सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार ठरलं होतं
१० नोव्हेंबर २०१९ पूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्यावेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. त्यादरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील. यातर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं.”
शरद पवारांच्या पत्रामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली
राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली,” असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. दावा फडणवीसांनी केला आहे.