शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ!

मुंबई : (Eknath Shinde On State Formers) दोन महिन्यापुर्वी परतीच्या पावसाने झालेली अतिवृष्टी, आणि नंतरच्या अवकाळी पाऊसमुळे मोठ्या संकटात अडकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत.
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीकं आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारनं मंजूरी दिली आहे. हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळं राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल विभागानं शासन निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आहे. मात्र हा निधी कधी मिळणार असा सवाल यानिमित्ताने तयार झाला आहे. त्याचे कारण म्हणजे दिवाळीच्या आधी देखील शिंदे सरकारने मोठ्या थाटात शेतकरी मदत जाहिर केली मात्र, ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे मदत तरी शेतकऱ्यांना मिळणार का घोषणा ही फक्त हवेचा बुडबुडा म्हणून राहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.