विधवा प्रथा बंद होण्यासाठी शासननिर्णय

महाराष्ट्राने उचलले पाऊल
आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे, यांसारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला.
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासननिर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींनी काम करावे, असे आवाहन करीत दि. १७ मे २०२२ रोजी शासननिर्णय जारी केला.
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणार्या हेरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी श्रीमती कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापुरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोनाकाळात घरातील कमावती कर्ती माणसे मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले.
याच कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी साजरा करण्यात येत होता. राजर्षी शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करीत होत्या. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न सर्व राज्यांत राबविण्याचे आवाहन केले आहे.
विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी, तसेच संविधनिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे.