OBC आरक्षणावरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड

मुंबई – OBC RESERVATION : सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय दिल्यांनतर महाराष्ट्रात राजकीय वातावरणात क्रिया-प्रतिक्रिया आणि श्रेय वादाला उधाण आलेलं दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षणाचा बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणासह लवकर घेण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आल्यापासून राज्यात भाजप – शिवसेना, महाविकास आघाडी आणि शिंदे – फडणवीस असे तीन सरकार सत्तेत आली. आणि प्रत्येक सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय काढण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. त्यामुळे आजच्या न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील पक्षांत श्रेय देण्या-घेण्यावरून टीका टिपण्णी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांत आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून वाद सुरु असल्याचं दिसत आहेत.
राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय झाला असल्याचं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आज महाराष्ट्रातील सर्वसमान्य ओबीसीचा विजय झाला आहे.
त्याचबरोबर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ओबीसी आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही दिलेले शब्द पाळतोच असं त्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील ट्वीट केले आहे. महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळेच ओबीसी समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळाले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.