“ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं”

मुंबई | Nana Patole On Central Government – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून ईडीविरोधात आक्रमक आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं. ईडी चावण्याची भीती दाखवून भाजप आपल्याकडे नेत्यांना वळवून घेत असल्याची बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे. नवी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर नाना पटोले यांनी ही टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारची दादागिरी सुरू आहे. इंग्रजांच्या अत्याचाराप्रमाणे भाजप सरकारचा देशात अत्याचार सुरू आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून केंद्र सरकारविरोधात आम्ही लढत राहणार आहे.
दरम्यान, देशभर आंदोलन सुरु असतानाच मुंबईत युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. बोरिवली स्टेशनवर युवक काँग्रेसचं आंदोलन सुरु असून, गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.