“उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीवर”

मुंबई | Narayan Rane On Uddhav Thackeray – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीवर आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. मी इथे आलो आणि मला सत्काराच्या वेळी पुस्तक दिलं. मला पुरूषार्थ हे पुस्तक दिलं. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
अडीच वर्ष त्यांनी काय केलं? असा सवाल करत नारायण राणे म्हणाले, आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. मी सांगेन की उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामं करा असा सल्ला देखील राणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. बाळासाहेब हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. कशाची सर देऊ यांना, कोळसाही म्हणू शकत नाही, असंही राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. भारतीय जनता पक्षाने त्यांचा वाढदिवस एक दिवस नाही तर 15 दिवस विविध माध्यमातून साजरा केला. पंतप्रधान मोदींचं जागतिक किर्तीचं व्यक्तिमत्व आहे. जगात त्यांचं कौतुक केलं जातं. कॅबिनेटला जेव्हा मी बसतो तेव्हा सर्व गोष्टी त्यांना माहित असतात. ते जेव्हा बोलत असतात तेव्हा वाटतं बघतच बसावं. मोदींना सर्व वर्गाची काळजी आहे, असं नारायण राणे म्हणाले.