‘आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं, सेनेतून हकालपट्टी झाल्यावर रामदास कदम ढसाढसा रडले!

मुंबई : (Ramdas Kadam On Shivsena) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत रामदास कदम यांची सोमवार दि. 18 रोजी शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले. 52 वर्षे मी सेनेचा भगवा खांद्यावर घेऊन काम केलं. पण, माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल आणि आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं हे सांगताना रामदास कदम भावूक झालेले पाहायला मिळाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडलं. पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एखाद्या पक्षासाठी 52 वर्षे लढणारा नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येते याचा विचार करुन, याचं आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे असंही रामदास कदम म्हणाले.
शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांची देखील हकालपट्टी करणार आहात का? असा प्रश्नदेखील कदम यांनी याावेळी उपस्थित केला. तसचं मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.