“…तर अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा”, भाजपच्या माजी आमदाराची मागणी

मुंबई | Ajit Pawar – सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच चर्चेत आहेत. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली होती. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. जर अजित पवारांना छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते हे मान्य नसेल, तर त्यांची रवानगी पाकिस्तानात करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी केली आहे. ते टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अजित पवार यांनी संभाजी महाराजांबाबत जे विधान केलं आहे, त्यानंतर त्यांना हिंदुस्तानातून हाकलून लावलं पाहिजे. त्यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही, छत्रपती संभाजी महाराज माहिती नाही. ते छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना इथे राहण्याचा कोणाताही अधिकार नाही. मी त्यांच्या विधानाचा निषेध करणार नाही, तर थेट त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करतो, असं नरेंद्र पवार म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र पवार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी बेताल व्यक्तव्य केलं. भाजपच्या नेत्यांनीही महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत चुकीची व्यक्तव्यं केली आहेत. तेव्हा तुमच्या लोकांची जीभ छाटली होती का? आधी त्यांना पाकिस्तानात पाठवा. मग आपण अजित पवारांच्या विधानाबाबत चर्चा करू, असं रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.