पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने देवेंद्र फडणवीसांना दचकून जाग येते – संजय राऊत

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. त्यांचा तसा जुना व्हिडीओ समोर आला आहे. एकीकडे आज राज्यातल्यात सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. तत्पूर्वी हा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावलाय. ‘देवेंद्र फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य आहे. आठ जगात आहेत दोन दिल्लीत बसली आहे, देवेंद्र फडणवीस धादांत खोट बोलतात. 50-50 चा फॉर्म्युला त्यांनीच शाह यांच्यासमोर मांडला होता. ते अद्याप पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडलेले नाहीत. विधानपरिषदेत त्यांचा पराभव झाला. आता कसबा आणि चिंचवडमध्ये त्यांचा दारूण पराभव होणार आहे,’ असा दावा राऊतांनी केला.
त्यामुळे आमच्या प्रतिमेबाबत त्यांनी कितीही वक्तव्य केली तरी त्याला तडा जाणार नाही. पहाटेच्या शपथविधीनं आजही त्यांना दचकून जाग येते. लोकांना उगाच उचलून तुरूंगात टाकणं ही भाजपची नीती आहे. त्यातून त्यांनी बाहेर यावं. त्यांनी कसली भिती होती? आमचे फोन त्यांनी टॅप केले. फोनटॅप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी त्यांनीच थांबवली. हे चोराच्या मनात चांदणं दिसतंय, असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला.