‘लॅाकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त…’; गुणरत्न सदावर्तेंचा अजब दावा

मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाबाबत दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसंच मंगळवारी उच्च न्यायालयाने सदावर्तेंचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणासह अन्य प्रकरणातही यापूर्वीच जामीन मिळाला असल्याने मंगळवारी संध्याकाळी सदावर्तेंची आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजार रुपयांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर करत ४,५ आणि ६ मे रोजी पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी अजब दावे केले आहेत.
यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आपण जेलमध्ये असताना आपण फक्त पाण्यावर होतो असा अजब दावा केला आहे. “सरकारला काय करायचं ते करु दे पण तत्वं सोडायची नाहीत. लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी लढणार आहेत. माझी मुस्कटदाबी केली तरीही मी मागे फिरलो नाही,” असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
“मी कष्ट करणाऱ्यांसाठी काम करणारा आहे. मी जेल नाही तर त्याला सत्याग्रह मानतो. माझ्या वडिलांना मोठा काळ सामान्य नागरिकांसाठी जेलमध्ये जावं लागलं होतं, त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे,” असं गुणरत्न सदावर्ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.
“मी मराठा समाज म्हणून विरोध केलेला नाही. असंविधानिक पद्धतीने जे आरक्षण देण्यात आलं होतं त्याविरोधात आमचा लढा होता. मी जात पाळत नाही. लाखो मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. मला जातीसोबत जोडू नका,” असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.