ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही…’; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भुमिका घेतली होती. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेनं दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवून थेट शिवसेनेलाच डिवचलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दांत मनसेला टोला लगावला आहे.

आज रामनवमीच्या निमित्ताने सकाळीच मनसेनं शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. “ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात”, अशा खोचक शब्दांत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेला आवाहन केलं. यानंतर किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून अशाच प्रकारे भोंग्यांवर हनुमान चालिसा वाजवली जात आहे.

 यासंदर्भात मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना मनसेच्या या कृतीवर निशाणा साधला आहे. “मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच मनसेकडून “शिवसेना भवन मस्जिद आहे का? असा प्रश्न करण्यात आलाय” अशी विचारणा पत्रकारांनी करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. “संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये