JK मध्ये दहशतवाद्यांकडून 4 सैनिकांची हत्या झाली, त्यावेळी पंतप्रधान फुलं उधळून घेत होते; राऊतांचा आरोप

छ. संभाजीनगर : (Sanjay Raut On Narendra Modi) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अंतरवाली गावातील उपोषणावरून सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अमित शाह (Amit Shah) छ. संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नयेत म्हणून उपोषण संपवण्याचे दिल्लीतून आदेश होते, असं राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलतांना राऊत म्हणाले, ज्या प्रकारे हे आंदोलन सुरू आहे ते ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे यावं लागलं, दोन उपमुख्यमंत्री पळून गेले. खरंतर त्या दोन मुख्यमंत्र्यांनी यायलं पाहिजे होतं. हा संपूर्ण सरकारचा प्रश्न असून एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. अजित पवार तर त्या समितीवर होते. मात्र डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून पळून जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात अलिशान हॉटेल बुक करण्यात आल्याच्या प्रश्नाला उत्तर देत राऊत म्हणाले की, हे सरकारच बेकायदेशीर असताना हा खर्च का होत आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व हॉटेल बुक केले आहेत का? आणि ते कोणासाठी असा प्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सैनिकांची हत्या झाली. चार तरुण लष्करी अधिकारी एकाचवेळी शहीद होतात. या घटनेने संपूर्ण देश दुःखात होता. मात्र, त्याचवेळी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळून घेत होते. दिल्लीतील खान मार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी शिवराज पाटील भेट देण्यासाठी गेले. या भेटीनंतर त्यांनी फक्त शर्ट बदलला म्हणून त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.